नवी दिल्ली : सौदी अरेबियाची भारतातील गुंतवणूक वाढवण्यासाठी ‘इन्व्हेस्ट इंडिया ग्रिड’ची स्थापना करण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या नीती आयोगाच्या शिष्टमंडळाच्या भेटीत ‘इन्व्हेस्ट इंडिया ग्रिड’ची घोषणा करण्यात आली.
नीती आयोगाचे अमिताभ कांत यांच्या नेतृत्वाखालील नामवंत कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सौदी सेंटर फॉर इंटरनॅशनल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या सदस्यांशी चर्चा केली. रियाध इथे झालेल्या या चर्चेत सौदीच्या १२ मंत्रालयांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला होता. व्यापार, व्यवसाय क्षेत्रातील ४० गुंतवणूक संधींबाबत या वेळी चर्चा करण्यात आली.
सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहमद सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद हे १९ आणि २० फेब्रुवारी २०१९ रोजी भारत भेटीवर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय शिष्टमंडळाची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
सौदी अरेबियाचे भारतातील राजदूत अहमद जावेद भारतीय शिष्टमंडळासमवेत होते. पर्यटन, गृहबांधणी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि वाणिज्य मंत्रालयाचे प्रतिनिधी या चर्चेत सहभागी झाले होते.
‘भारतात सौदी अरेबियाची गुंतवणूक वाढवावी यासाठी ‘इन्व्हेस्ट इंडिया ग्रिड’ची स्थापना करण्यात आली असून, गुंतवणूक प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी एक विशेष गट नेमण्यात आला आहे. नीती आयोग आणि सौदी सेंटर फॉर इंटरनॅशनल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप यांनी भारत आणि सौदी अरेबियातील धोरणात्मक भागीदारी वाढवण्यासाठी सहकार्य करण्याचे मान्य केले आहे,’ असे दोन्ही देशांच्या वतीने काढण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सौदी अरेबियाचे वित्त मंत्री मोहमद अल जदान यांच्याशी नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांनी चर्चा केली.
‘भारत आणि सौदी अरेबियातील आर्थिक सहकार्यासाठी सहा कार्यकारी गटांनी गुंतवणूक, व्यापार आणि व्यवसाय क्षेत्रात ४० वेगवेगळ्या संधी निश्चित केल्या आहेत,’ असेही या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
भारत आणि सौदी अरेबियातील व्यापार एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान २३.२४ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढला आहे.